राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी; सरकारचा मोठा निर्णय
३० मार्चपूर्वी शेतकरी कर्जमाफी, सरसकट लाभ; कृषिमंत्री भरणे यांची मोठी घोषणा

मुंबई/ प्रतिनिधी
राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा सरसकट लाभ दिला जाईल, अशी घोषणा कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली आहे. सत्ताधारी महायुती सरकार २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाची पूर्ती करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून शेतकरी संघटनांचे आंदोलन आणि विविध पाठपुरावे सरकारने लक्षात घेतले आहेत. या पार्श्वभूमीवर सरकारने कर्जमाफीसाठी स्पष्ट कालमर्यादा जाहीर केली आहे. कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले की, शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे सरकारचे कर्तव्य आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफीबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
अजूनही संभ्रमावस्था कायम
विशेष म्हणजे, गेल्या काही काळापासून कर्जमाफी संदर्भात नेमके काय घडणार याबाबत शेतकरी वर्गात संभ्रम निर्माण झाला होता. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या आंदोलना दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, शेतकऱ्यांमधील चिंता अजूनही कायम आहे, कारण कर्जमाफीची निकष, कर्जाची रक्कम मर्यादा आणि लाभार्थ्यांची संख्या याबाबत महत्त्वाचे निर्णय अद्याप निश्चित झालेले नाहीत.
या संदर्भात गठित करण्यात आलेल्या विशेष समितीचा अहवाल सरकार प्रतिक्षेत आहे. या समितीचा अध्यक्ष मुख्यमंत्री यांचे मुख्य आर्थिक सल्लागार प्रविण परदेशी हे आहेत. या अहवालाच्या आधारे राज्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत योजना जाहीर केली जाण्याची शक्यता असून, त्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया अधिक गतीने पुढे नेण्यात येईल, असे मंत्र्यांनी सांगितले.



