बांगलादेशी हिंदूंचा धार्मिक छळ रोखण्यासाठी भारत सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा..!
सोलापूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सोलापूर : बांगलादेशात हिंदूंवर वाढत असलेले अत्याचार, हत्या आणि धार्मिक छळ तात्काळ थांबवावेत, यासाठी भारत सरकारने कठोर राजनैतिक हस्तक्षेप करावा तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव टाकावा, या मागणीचे निवेदन सोलापूर येथे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री वैभव साखरे, संदीप ढगे, महादेव लटके, विनोद रसाळ, बालराज दोंतुल, बिपिन गणपा, सागर बापट, राहुल हिबारे इत्यादी उपस्थित होते.
बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदु समाजावर सुनियोजित हिंसाचार, हत्या, मंदिरे जाळणे, घरे उद्ध्वस्त करणे आणि जबरदस्तीने स्थलांतर घडवले जात असल्याच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. हिंदु युवक दीप चंद्र दास यांच्या अमानुष हत्येसह अनेक घटनांमुळे तेथील हिंदु समाजात तीव्र असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी, दोषींना कठोर शिक्षा, धार्मिक स्थळांचे संरक्षण, तसेच आंतरराष्ट्रीय मंचांवर हा विषय प्रभावीपणे मांडण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली.



