धाराशिव जिल्ह्यात कडाक्याच्या थंडीची लाट
तापमानात मोठी घट; पहाटेच्या शेकोट्यांनी घेतली उब

धाराशिव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीची लाट उसळली असून तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. हिवाळ्याची गुलाबी चाहूल प्रकर्षाने जाणवत असून नागरिकांची पहाटेच्या शेकोट्यांकडे धाव सुरू झाली आहे.
गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा सातत्याने खाली जात आहे. त्यामुळे कपाटात ठेवलेले ऊबदार कपडे, स्वेटर, कानटोप्या आणि मफलर यांची पुन्हा बाजारपेठेत चांगली मागणी वाढली आहे. थंडीची कुडकुड वाढल्याने नागरिक ऊबदार कपड्यांची खरेदी करण्यासाठी बाजारपेठांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत.

आरोग्य तज्ञांच्या मते, तापमानातील घट पाहता पुढील काही दिवसांत कडाक्याची थंडी वाढण्याची शक्यता असून विशेषत: दम्याच्या रुग्णांनी अतिरिक्त काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तरुण मात्र आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी जॉगिंग, सायकलिंग आणि व्यायामाकडे वळू लागले आहेत.
ग्रामीण भागात पहाटे शेकोट्यांना ऊब
ग्रामीण भागात थंडीपासून बचाव करण्यासाठी भल्या पहाटे पाला-पाचोळा, काटक्या, तुराट्या गोळा करून शेकोट्या पेटवण्याची पद्धत आजही तितक्याच उत्साहात सुरू आहे. आधुनिक युगातही ग्रामीण भागातील शेकोटीची परंपरा कायम असून लोकांना एकत्र आणणारा हा उबदार क्षण आजही टिकून आहे. जिल्ह्यातील वाढती थंडी, घटती तापमानरेषा आणि नागरिकांची हिवाळ्यावरील हालचाल यामुळे यंदाचा हिवाळा अधिक तीव्र ठरण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.




