तपोवनासाठी सयाजी शिंदेंनी घेतली मनसे राज ठाकरेंची भेट
साधूग्राम उभारण्यासाठी हजारो झाडे कापली जाणार

नाशिक : नाशिकमध्ये यंदा सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. या कुंभमेळ्याच्या तयारीसाठी महायुतीकडून जोरदार तयारी केली जात आहे. दरम्यान, तपोवनासाठी प्रशासनाकडून झाडांची कत्तल करण्याचे ठरवण्यात आले. राज्यामध्ये पर्यावरण प्रेमी आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला. नाशिकची ही झाडे वाचवण्यासाठी आता सजायी शिंदे यांनी मुंबई गाठली. अभिनेते सयाजी शिंदे यांनी मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेतली.
राज्य सरकारकडून साधूग्राम उभारण्यासाठी हजारो झाडे कापली जाणार आहेत. भलीमोठी ही झाडे कापल्याने जैवविविधता, प्राणी आणि पक्षांचे मोठे नुकसान होणार आहे. याविरोधात सह्याद्री देवराई संघटनेचे सर्वेसर्वा सयाजी शिंदे यांनी आक्रमक भूमिका घेतली. सयाजी शिंदे यांनी सरकारवर टीका करत मोठे जनआंदोलन उभे केले. याच पार्श्वभूमीवर आता सयाजी शिंदे हे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. सयाजी शिंदे हे सोमवारी (दि. 08) सकाळी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासोबत राज ठाकरे यांच्या मुंबईतील शिवतीर्थ या निवासस्थानी आले. नाशिकच्या वृक्षतोडीविरोधात सयाजी शिंदे म्हणाले की, राजकारणाबदल माझा अभ्यास नाही, पण झाडाबद्दल राजकारण करू नका. अजितदादांनी पाठिंबा दिला तसा भाजपच्याही काही लोकांनी पाठिंबा दिला आहे. 50 फूटी झाडं तोडायची आणि त्या बदल्यात नवी झाडं लावायची.. एवढी मोठी पळवाट शोधू नका. चुकीचा निर्णय होता कामा नये. सगळी झाडे जगली पाहिजेत. झाडांचा आधी विचार नंतर माणसांचा विचार केला पाहिजे. साधू आले-गेले काही फरक पडत नाही, पण झाडं गेली तर फरक पडतो, अशी आक्रमक भूमिका सयाजी शिंदे यांनी घेतली आहे.



